श्री रमेश चोपडा व परीवारानी स्वखर्चातून निर्माण केले अहिल्यादेवींचे सुंदर स्मारक..
July 16, 2025
0
अजित गायके संपादक
पूण्यश्लोक न्यूज
*अहिल्यासागर*
▫️लोकमाता अहिल्यादेवींच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर...
▫️श्री रमेश चोपडा व परिवार मुक्काम पोस्ट अश्वी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांनी निर्माण केले अहिल्यामातेचे सुंदर स्मारक
▫️आदरणीय श्री रमेश चोपडा यांच्या शब्दांतून.....
▫️ राजमाता अहिल्यादेवी होळकर या माळवा प्रांतातून चांदवड भेटीनंतर निफाड मार्गे पळशीला जात होत्या. शुभेदार मल्हार होळकर यांचे दिवाणजी रामोजी यादव यांचे मूळ गाव पळशी ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथेच. त्यांची व मल्हाररावांची ओळख झाली व त्यांनी वास्तव्यासाठी पळशी येथे सुंदर वाडा बांधला. हा वाडा दोन मजली असून काम कोरीव व देखणे आहे. चांदवड ते पळशी प्रवासात अहिल्यादेवी आपल्या सहकार्यासह खांबे मार्गे जात असताना सूर्य मावळतीला चालला होता. पळशीला पोहोचायला आता खूप उशीर होईल म्हणून त्यांनी खांबे येथेच थांबायचा निर्णय घेतला. त्याकाळी खांबे हे गाव धनगर समाजाचे असल्यामुळे समाजाने अहिल्यादेवींची मुक्कामाची व्यवस्था चोपडा परिवाराकडे केली. चोपडा परिवार त्याकाळी शेती व व्यापाऱ्यानिमित्त खांब्यात स्थायिक झालेले. हा चोपडा परिवार मुळचा राजस्थानचा. सोळाव्या शतकात खंबे येथे स्थायिक झालेला. चोपडा परिवारांचा पाहुणचार घेऊन सकाळी राजमाता पुढील भेटीसाठी रवाना झाल्या. त्याचबरोबर खंबे येथील दहा-बारा लोक त्यांच्या सेवेत बरोबर गेले. त्यांचे वंशज आजही इंदोर येथे वास्तव्यात आहेत. ही घटना आम्हाला आमच्या पूर्वजाकडून माहित पडली. त्याची आठवण ठेवून श्री गणेश दासजी चोपडा यांनी संगमनेरी महादेव मंदिर साध्या पद्धतीने बांधलेले होते. माझे वडील श्रीनाथमलजी चोपडा यांचे 1 ऑगस्ट 1983 रोजी व मातोश्री सक्करबाई चोपडा यांचे 21 ऑगस्ट 2009 रोजी निधन झाले. श्रीनाथमलजी चोपडा यांचे बाराव्या दिवसाचा कार्यक्रम खंबे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात करण्याचा मानस होता. परंतु खंबे गावातील लोकांनी सांगितले की बाराव्या दिवसीय कार्यक्रम करण्यापेक्षा आपल्या गावातच नव्हे तर तुमच्या घरात राजमाता मुक्कामी येऊन गेल्या आहेत. आपण राजमातेचे योग्य स्मारक बांधा. गावकऱ्यांच्या या सूचनेप्रमाणे चोपडा परिवाराने लोकांच्या निर्णयाचे स्वागत केले. गावकऱ्यांनी आम्हाला हा मुद्दा सांगितलेला पटला आणि राजमातेची सुंदर मंदिर बांधण्यास सुरुवात झाली. बांधकाम चालू असताना अनेक अडचणी आल्या. त्यातच आमचे बंधू बबनभाऊ चोपडा यांचे 14 जानेवारी 2020 ला आकस्मिक निधन झाले. त्यांच्या हस्तीचे खंबे येथेच विसर्जन केले. गावकरी अस्थिवियसर्जनाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यावेळेस उपस्थितांना आम्ही शब्द दिला की राजमातेचे मंदिर एक वर्षात पूर्ण करू. नंतर करोना महामारी, लॉकडाऊन आणि आमचे दुर्दैव समजा आमच्या भाभी श्यामाबाई चोपडा यांचे निधन 26 डिसेंबर 2019 रोजी झाले. त्या संकटाच्या अडचणीवर मात करून 1 मार्च 2022 ला महाशिवरात्रीच्या दिवशी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळाची स्थापना केली. सदरहू अहिल्यादेवीचे मंदिर नगर येथील कलाकार श्री लक्ष्मीकांत गवळी यांनी तयार केलेली आहे. चोपडा परिवारातील सदस्य रमेश चोपडा, मनोज चोपडा, संदीप चोपडा, मंगेश चोपडा, निलेश चोपडा, अतुल चोपडा, शितल चोपडा त्यांनी फार मेहनत करून जांभळावडा या मोठ्या वड्याच्या मध्यभागी खडक बेटावर अप्रतिम मंदिर बांधून पंधरा गुंठे परिसर वेगवेगळ्या वर्षाची लागवड करून सुशोभित केला असून मंदिराच्या समोर नयनरम्य तळे असून स्मृतीस्थळाचा अंदाजे खर्च 25 लाख झालेला आहे. खंबे हे गाव मूळ सतरावे शतकातील असून आजही धनगर समाज येथे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. चोपडा परिवार म्हणतो
"जे जे लाभलं ते ते देवी अहिल्याची कृपा!"
प्रत्येक भारतीय व्यक्तीनं शक्य असेल तेव्हा अहिल्यादेवींचं स्मृतीस्थळ पाहयला यावं.
येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.
श्री रमेश चोपडा
मुक्काम पोस्ट अश्वी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांच्या शब्दांतून.....
✍️ प्रा. सोमनाथ लांडगे, संचालक श्री साई श्रध्दा एज्युकेशन धाराशिव.
मो. 9422941929


Post a Comment
0 Comments